Saturday, March 17, 2012

अश्या रीतीने आम्ही (मी) सुखरूप पणे ( न घाबरता) घरी पोचलो !!

दि. शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९
स्थळ दरबन - साउथ आफ्रिका
लवकरच झोपावं असं वाटत होतं. कारणही तसच होतं. सकाळी अमोल आणि प्रियाला विमानतळावर सोडायला जायचा होतं. थोडं टेन्शन आलेलं. पहिल्यांदाच मी इतक्या दूर गाडी चालवून जाणार होतो. परतताना एकट्यालाच यायचा होतं. नवीन शहर, नवीन चालक .. आणि समोर होता एक नवीन थरारक अनुभव !
धाकधूक अन उत्साह. जोखीम मोठी होती माझ्या छोट्या चुकीमुळे त्या दोघांना त्रास होवू शकला असता. त्यांनी केलेल्या केपटाऊन प्रवासाचा बेत फसला असता.
पण माझा आत्मविश्वास दांडगा होता ( असं आता वाटतंय ! )
सकाळी ५ ला निघण्याच ठरलं. ७.३० ला उड्डाण होतं. दडपणामुळे रात्री ३-४ वेळा जाग आली. साडेचारला पुन्हा अचानक जाग आली अन मी घड्याळाकडे निरखून बघितलं. नंतर खिडकी बाहेर डोकावून बघितलं तर चक्क उन पडलेलं. दरबनला सूर्योदय फारच लवकर होतो हे तेव्हा कळलं . तेवढ्यात फोन वाजला. अमोल होता. मी सुद्धा लगेच उठून प्रात:विधी उरकले. अंघोळ करून निघालो. अमोल कडे गेलो तो तयारच होता. बँग्स गाडीत कोंबल्या अन मी गाडी बाहेर काढली.
माझी परीक्षा सुरु झाली ... मेलेनियम ब्रिज जवळून डावीकडे वळून, १० मिनिटांनी N-2 हाय वे वर पोचलो आणि मी (एकदाचा) पाचवा गियर टाकला अन गाडीने १२० चा वेग घेतला.
अमोल मला मधून मधून सूचना देत होता. त्या मी पुरेपूर अमलात आणण्याचा प्रयत्न करत होतो. पहिल्यांदाच विमानतळाच्या रस्त्याने मी जात असल्यामुळे शक्य तितका रस्ता लक्ष्यात ठेवत होतो.
आता दडपण जाणवत नव्हतं. रस्ता सरळच होता आणि सकाळच्या वेळी रहदारी सुद्धा नव्हती. लवकरच आम्ही विमानतळाच्या उड्डाण पुलाकडून वळलो. अमोल मी गाडी चा वेग कमी करण्यास सांगून मला परतीचा रस्ता समजावून सांगितला आणि 'हा' टर्न चुकवू नकोस असे बजावले.
मला आता छान वाटत होतं. अमोल व प्रियाने सामान चेक इन केलं. आम्ही नास्ता केला अन त्यांना बाय करून मी निघालो.. परतीच्या वाटेवर.. एकटाच .. अनोळखी रस्त्यावर ..
घाबरलो नाही आपण (फक्त भ्यायलो), मागे एका गाडीने भोंगा वाजवला अन त्या गाडीला वाट देतांना घडू नये तेच घडलं. अमोल ने दहा वेळा बजावून सांगितलेलं वळण सोडून बाजूच्या रस्त्यावरून मी गाडी वळवली .......
रस्ता ओळखीचा वाटेना ..अमोलला फोन ...त्याचा आवाज आकाशवाणी सारखा भासला "वत्सा, रस्ता चुकलास !!" सकाळच्या वेळी घाम फुटला ..
त्याच्या प्रवासाची सुरवात ह्या माझ्या गोंधळाने झाली. त्याचा जीव सुद्धा टांगणीला ...
त्याने सरळ जात राहण्याचा सल्ला दिला अन तेवढ्यात त्याला फोन बंद करावा लागला कारण त्याचं विमान उड्डाणासाठी तयार झाल्यामूळे फोन बंद करण्याची सूचना मिळाली.
माझ्यासाठी ती धोक्याची सूचना होती. ...पण मी घाबरलो नाही ...
उरलासुरला धीर आणि थरथरत्या हातानी गाडीच सुकाणू धरून मी चालवत राहिलो.
वाटलं "U" वळण मिळेल थोड्या अंतरावर .. पण माझी परीक्षा सोपी नव्हती. माझी अवस्था, इतिहासाचा अभ्यास करून गेलेल्या पण ऐनवेळी बीजगणित भूमितीची परीक्षा द्यावी लागलेल्या विद्यार्थ्यासारखी जाहली ... हाय वे असल्यामुळे कित्येक किलोमीटर पर्येंत U नव्हतं.
"Durban - City Center" असं लिहिलेला फलक दिसला म्हणून तिकडे गाडी दामटली. पण बुडत्याचे पाय खोलात...मग धडकी भरली जिकडे तिकडे गाड्याच गाड्या. असंख्य वाहतूक दिवे ...!
वाट फुटेल तिकडे जात होतो.
एका कमी गर्दीच्या ठिकाणी गाडी चा वेग कमी करून एका कृष्णवर्णीय महाभागास पुसले असता, "डावीकडून" वळून जाणेस सांगण्यात आले. तैसेची केले.
थोडे पुढे जाताच फौजदाराची दिव्यांची गाडी माझा पाठलाग करीत असल्याचे माझ्या चाणाक्ष चक्षुंनी हेरले. बहुदा एकाच दिवशी सर्व विषयांची परीक्षा देण्याची वेळ माझ्यावर आली होती.
आता मात्र मी पुरता गडबडलो ......... पण अजिबात घाबरलो नाही मी !.. (फक्त जाम भ्यायलो)
सकाळी गडबडीत माझे पारपत्र सुद्धा घरीच विसरलेलो ! ...... राम राम राम म्हणत हळूच कडी डावीकडे वळवून बस थांब्याजवळ उभी केली ... फौजदार जवळ आले .. मी मनाची पूर्ण तयारी केली अन डोळे घट्ट मिटले. माझं हृदय आता १२० च्या वेगाने धडधडत होतं.. अजून कसे खाली उतरण्यास सांगितले नाही ते बघण्यासाठी मी हळूच डोळे उघडले .. बघतो तर चमत्कार !! फौजदार गाडीसह पसार झालेले .. माझ्या नाडीचे ठोके ६० वर येईपर्यंत तिथेच थांबलो. तेवढ्यात एक मध्यमवयीन स्त्री नजरेस पडली. तीस विचारता झालो. "हे देवी !, गेट वे ह्या मा(हा)ला कडे जाण्याचे झालेस कैसे?"
धीरगंभीर आवाजात "समोरच नूतन फूटबॉलचे मैदान आहे, त्यास वळसा घालून उजवीकडे गेलेस तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील !, तथास्तु !" असे उत्तर आले.
त्या देवीस कोपरापासून नमस्कार करून मी "फेकला तटावरुनी घोडा !"
माझे मन मला मनापासून सांगत होते, आता कुठेतरी डावीकडे वळावे, पण सकाळपासून मनाने बरेच पराक्रम केल्याने मी लगाम आवरला.
शेवटी हिम्मत करून एक उजवे वळण घेतले. मग एक जंगल सदृश्य रस्ता सुरु झाला. पुन्हा एकदा रस्ता भटकल्याची भीती मनात डोकावली .
पण मी डगमगलो नाही, घाबरलो तर मुळीच नाही ..एकेरी रस्ता असल्याने U टर्न घेण्याचा मोह आवरता घ्यावा लागला.
खिन्न मनाने गाडी पळवत राहिलो, पळवत राहिलो आणि एके स्थळी हिरव्यागार झाडीतून अचानक हवेत मंद सुगंध जाणवला, पक्षी मधुर स्वरात किलबिलाट करीत आहेत, फुले हलकेच डुलत आहेत असा भास होवू लागला ...
तो भास नव्हता.... La Lucia Mall असा फलक दिसला. नकळत सिनेमातल्या नायकाप्रमाणे मी क्षणात सुकाणू फिरविले.
दुसऱ्याच क्षणी मी माझ्या ऑफिस च्या समोर होतो .. विश्वासच बसत नव्हता .. हर्षवायू होतो की काय असे वाटले .. आणि हुर्रे ..
अश्या रीतीने आम्ही (मी) सुखरूप पणे ( न घाबरता) घरी पोचलो !!
चीअर्स - प्रदीप !

माझी शाळा !

माझी शाळा !
शाळा .. नुसता शब्द्द उच्चारला तरीही साऱ्या आठवणी जाग्या होतात.
आमच्या गावात, बुलढाण्यात, तश्या बऱ्याच शाळा ... पण फुलबाग बालक मंदिरानंतर सर्वात जवळची हीच एक.
शाळा लहान .. पण शिस्तीची,

पांढरी स्वच्छ लुंगी गुंडाळून उघड्या अंगाने फिरणाऱ्या दहीगावकरांच्या भल्यामोठ्या वाड्यात भाड्याने दिलेल्या अनेक खोल्यांपैकी सहा खोल्यांमध्ये शाळेचा विस्तार.
४ इयत्ता + १ ऑफिस + १ स्टोर रूम .. आमच्या केशव नगर आणि आसपासच्या नगरांमध्ये एकमेवाद्वितीय , परंपरागत अशी ही आमची शाळा ..
 
सकाळी सुरेल आवाजात गाणारा भोंगा आम्हाला शाळेकडे खेचून आणीत असे.
येह देश है वीर जवानोकां......, इस देशकी धरती सोना उगले ... अश्या स्पुर्तीदायक गाण्यांनी आमचे चिमुकले दंड स्पुरण पावायचे. छाती पुढे काढून ऐटीत गाण्याच्या तालावर चालायचो.

शाळेची पहिली घंटा झाल्यानंतर ती ऐकून पळतच आम्ही घरातून बाहेर पडत असू.
राष्ट्रगीतानंतर वर्गात सगळ्या कवितांची घोकंपट्टी, मंदिरात तल्लीन होवून सुरु असलेल्या मंत्रोच्चारा सारखे वाटत असे.

एका तालासुरात .."नवी लकाकी .. झाडांवरती .. सुखात पाने फुले नाहती" ... ह्या कवितेतील चालीमुळे अवतरलेली नविल "काकी" झाडावरती सुखात कशी बसत असेल हे कोडे सातव्या वर्गात जाई पर्यंत मला उमगले नव्हते. कुणाच्याही काकीला कधी झाडावर चढून बसलेली मी ऐकली / बघितली नव्हती.
कविता  शिकवताना सरांनी साभिनय केलेले नृत्य अजूनही जसाच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. पावसाची कविता शिकवतांना चिंब भिजलेले सर, मोरासारखे नाचलेले आठवतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत शाळेजवळच्या मळ्यात वर्ग थाटायचे आमचे सर. 
मळ्याचा "म" उच्चारायची देर की लगेच आमची वानरसेना टणाटण उड्या मारत तीन पायाचा फळा, खुर्ची, चटया, रूळ, हजेरीच रजिस्टर, डस्टर आणि दप्तरे घेवून एका रांगेत, प्रभू रामचंद्रांच्या एका इशाऱ्या सरशी दक्षिणेकडे निघालेल्या वानरसेनेसारखी छाती फुगवून सरांच्या मागे निघायची.

फळा कुणी धरायचा, डस्टर , खुर्ची कुणाच्या ताब्यात असेल सरांचा रूळ हातात घेवून रुबाबात कोण मिरवेल, अश्या असंख्य अतिमहत्वाच्या मुद्द्यांवर वानरसेनेचे अनेक गट तयार होत.

अतिशय मानाची समजली जाणारी ही पदे भूषवण्यासाठी प्रसंगी जीवावर उदार होवून शत्रुपक्ष्यावर तुटून पडत असू.
आजकालच्या राजकीय पक्ष्यांसारखेच गटबाजी, नाराज कार्यकर्ते, बाहेरून पाठींबा देणारे, सगळ्या गोंधळात स्वतःचे हित साधणारे, सावध पवित्र घेणारे किंवा तटस्थ असणारे असे अनेक गट तयार होत.
ह्या सर्व गोंधळात अन उत्साहाच्या वातावरणात नेहमीप्रमाणे सरांच्या हातचा मार खाणारे सराईत नेते, मला इंग्रज सरकारच्या लाठ्या झेलून झेंडा खाली न पडू देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांसारखे भासत. मार खावून पाठीचे धिरडे झाले तरी बेहत्तर, पण हातातले डस्टर सोडणार नाही असे निश्चयाचे महामेरू असणारे अनेक वीर आमच्या वानरसेनेत होते.

यात देवीच्या मंदिराजवळ झोपडपट्टीत राहणारा किस्ना मोरे, "मेकुडे उदंड जाहली" म्हणून लपून छपून हळूच ते खाणारी शेंबडी गंगू, अभ्यासात अतिशय हुशार आणि त्यामुळे घरचे माझी तुलना सतत ज्याच्याशी करत असत तो आशिष जैन, ऋषी कपूर ची style मारणारा महावीर माहुरकर, मोत्यांहून सुंदर अक्षर असणारा पण शुद्ध लेखनात कच्चा असणारा नंदू, चिंचोका घश्यात अडकल्यामुळे ऑपरेशननंतर अन्ननलिकेत शिट्टी बसवलेला मंग्या, सरांच्या उंचीचा, आडदांड, दादागिरी करणारा बाबा आढाव, सुगरीणींची घरटी तोडून आणणारा काळाकुट्ट फुलसुंदर, अतिशय नीटनेटकी व्यवस्थित असणारी, माझ्याशी लेखनांवरून भांडणारी वैशाली उबरहंडे, फुलासारखी नाजूक असणारी, शाळेजवळ राहणारी अंजू पंचवटकर, हरीणासारखा चपळ, दिवाळीतले कणकेचे दिवे खाणारा सचिन पाटील, महावीर नगरात राहणारा, हातात कडे घालून स्वतःला शक्तिमान समजणारा चंद्रकांत खोत, अतिशय शांत, भित्रट, तरी प्रधान आडनाव असणारा प्रशांत, सफरचंदाचे गाल असणारी "टमी" (खरं नाव राजकुमारी ) , सरांच्या हातचे फटके नेहमी खाणारा, राजेश झोड, शाळेत सराव्यतीरिक्त इस्त्रीचे कपडे घालून फिरणारा एकमेव अरुण निकम, माझ्या घराजवळ राहणारी बंजारा सिंधू, मनाविरुद्ध वागलं तर स्वतःचं डोकं भिंतीवर आपटणारी उज्वला, निळ्या डोळ्यांचा गोरापान प्रसन्न उमरकर, बालकवींची "हिरवे हिरवे गार गालिचे ..." कविता पाठ असणारा सुहास .. एक ना अनेक ....

मळ्यातून खडू आणण्यासाठी शाळेत पाठवलं तर, संजीवनी बुटी आणण्यासाठी गेलेल्या पवनपुत्र हनुमानाला मागे टाकणाऱ्या गतीने धावणारी, पाच पैकी एक खडू हळूच खिशात टाकणारी आम्ही मुले ! ;)
शिक्षा म्हणजे अजब प्रकार असे. पोटामध्ये चिमटा घेणे, वेताच्या छड्यानी हात लाल करणे, वर्गातल्या कपाटावर उभे करणे, कोंबडा करून पाठीवर खडा ठेवणे, मुलांना मुलींच्या रांगेत बसवणं असे प्रकार चालत.
कधी चुकून घरी राहिल्यास चार हट्ट्याकट्ट्या मुलांना सर उचल बांगडी करून आणावयास सांगत.
झालेली शिक्षा घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता ! घरी कळले तर अजून मार बसण्याची खात्री होती. कुणाच्याही पालकांनी तक्रार केलेली आठवत नाही ...... तक्रार केलीच तर "घरीसुद्धा हा कुणाचं ऐकत नाही, थोडं आणखी बडवून काढा " अश्या स्वरुपाची असायची !

पहाडे, पदमने आणि खक्के (काही मुलं त्यांना खप्के असं म्हणायची. त्याचं कारण नंतर कळले की ते नावाप्रमाणे खपाखप खप्के देत) ही आमची शिक्षक मंडळी !

दत्तगुरूंच पहिलं दर्शन कधी झालं ते आठवत नाही, पण ही त्रिमूर्ती अजूनही सदैव आठवणीत आहे.
कित्येक पिढ्या त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या भरवश्यावर ह्या दुनियेत सफल अन सुकर आयुष्य जगताहेत.

त्यांचा अतिप्रचंड उत्साह आणि शिकवण्याची तळमळ आजकालच्या प्रत्येक शिक्षकाला मिळावी.
जीवनभर त्यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी अशीच माझ्या सोबत राहावी आणि त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी राहावेत अशी मनापासून इच्छा !

चीअर्स! - प्रदीप