रविवार, २१ फेब्रुवारी, २०१०

माझं मन

तुझ्यासमोर नेहमी हसणारा मी कधी अश्रू ढाळताना आढळलो तर आश्चर्य वाटून घेवू नकोस...
उसनं अवसान आणून हसणं शिकलोय मी कधीच,
प्रत्येकवेळी समोरच्याला हसवतांना,
मी फसवत असतो स्वताला
मुरड घालण्याची सवयच झालीय
आता माझ्या मनाला..

- प्रदीप

फुलं सुकतील कदाचित...

ही फुलं सुकली असतील कदाचित,
पण त्यामागच्या भावना सुकणार नाहीत कधीच,
ह्यांचा सुगंध नसेल दरवळत आता,
पण धुंद करून गेलाय कधीतरी तो।


रंग फिके पडले असतील कदाचित,
पण अंतरंग बघ ते विटणार नाहीत कधीच,

कारण प्रत्येक फुलाला माहित असतं,
एक दिवस येणार,
क्षणिक सुखाचा सुगंध सांडून
आपण अन सुकणार.

तरीही प्रत्येक  फुल,
नव्या उमेदीनं फुलतं
सुगंध उधळत चहू दिशांना ,
मंद हवेवर झुलतं...

- प्रदीप

माझ्या चारोळ्या!

तुझ्यावरच्या विश्वासाला,
पुरावा नकोय मला,
माझा माझ्यावरचाच विश्वास,
उडत चाललाय हल्ली !
- प्रदीप

माझी कविता

शब्द लगेच दिसून येत नाहीत,
त्यासाठी दुखः थोडं हलक व्हावं लागतं,
रातराणी सारखं ते उमलून यावं लागतं,
त्या मुग्ध सुगंधात सार सार सुसह्य होतं,


आयुष्याच्या पहाटे जुळलेल्या
ह्या दोन ओळी मी जीवापाड जपेल,
मला कुठे ठावूक होतं तुझं असणं,
हीच माझी कविता असेल।


- प्रदीप

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

आयुष्य..

आयुष्य खूप थोडं आहे
म्हटलं तर क्षणाचं,
आयुष्य म्हणजे तळ आहे
हातावरल्या थेंबांच,

आयुष्य म्हणजे स्वप्नं आहे,
आतुरलेल्या कुणाचं,
आयुष्य म्हणजे गोड गाणं,
स्वच्छंद मनाचं.

आयुष्य म्हणजे जग नाही,
तुझं माझं दोघांचं,
आयुष्य म्हणजे चित्र नाही
फक्त दोन रेघांच

अवखळ उघड्या वाटेवरती
गडगडणाऱ्या मेघांच,
आयुष्य म्हणजे तुफान वारं
बेधुंदीच्या वेडाच

सुख म्हणजे हिरवी वाट,
स्वप्नातल्या सत्त्याची,
दुखः म्हणजे केवळ राख,
मनामधल्या हत्त्यांची.

सुख म्हणजे वेडी आशा,
खळाळणार्या ओढ्याची,
कड्यावरून स्वतःला
झोकणाऱ्या वेड्याची.

सुख असं भोगताना,
जाणीव असु दे दुःखाची,
दुःखाच जर केलास गाणं
गरजच काय सुखाची?

- प्रदीप